स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

शनिवार, २५ जून, २०१६

अभेद्य व अजिंक्य - किल्ले रामसेज

🚩 अभेद्य व अजिंक्य - किल्ले रामसेज 🚩

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्याला इतिहासाच्या पराक्रमाची झालर आहे, पैकी असे कित्येक किल्ले आहेत कि ज्यांची उंची कमी, उजाड मोकळ्या डोंगर रांगांमध्ये एकच डोंगर रांग, ज्याला भौगोलिक क्षेत्र हि कमी पण ज्यांची इतिहासात एक बलाढ्य किल्ला, ज्यांची इतिहासामध्ये सोनेरी पाने लिहिली गेली अश्या किल्ल्यांपैकी नाशिक जवळील किल्ले रामसेज ची रक्तरंजित कहाणीही तेवढीच रोमांचकारी आहे.
हा किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ साडे पाच वर्षे सतत झुंज दिली. मराठ्यांच्या या इतिहासाची नोंद आपल्याला मोघलांच्या दप्तरी आपल्याला लिहलेली आढळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडे पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे.

🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡

नाशिक पासून पेठ गावी जाणाऱ्या रोडवर आशेवाडी हे गाव 15 km आहे, या गावात पोचल्यावर गावच्या डाव्या बाजूला अभेद्य किल्ल्याचे आपणास दर्शन होते, व इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला हा किल्ला जणू आजही तेवढ्याच हिम्मतीने, त्याच रगिने आजही आपणास स्फूर्ती, कठीण काळात योग्य लढा देऊन जगण्याची प्रेरणा देतो.
गावामध्ये गाडी पार्क करून गडाच्या उजव्या बाजूने पायवाटेने जावे, थोडे पुढे गेल्यावर आपल्याला गडाची माहिती देणारा फलक व सिमेंट मध्ये केलेला रस्ता लागेल, या वाटेने पुढे गेल्यावर ज्या ठिकाणी सिमेंट चा रास्ता संपतो व गडाची खडी चढाई सुरु होते, या ठिकाणी जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतील येतून अर्धा तासाच्या रस्ता चढाई करून गेलो कि आपण गुहेतील शिवलिंगजवळ येऊन पोचतो. गडाच्या काळ्या कपारीमध्ये हि गुहा कोरली असून आतमध्ये शिवलिंग व नंदी आहे, पावसाळ्यामध्ये यामध्ये पाणी असते. या गुहेचे वैशिट्य म्हणजे याला वरती 2 फुटाचे भोक पाडले आहे जे कि गडावरील पाण्याचे टाके भरले कि त्यातून बाहेर पडणारे पाणी या गुहेमध्ये पडते. वास्तविकता या गुहेची व वरील दरवाजाची पाहणी केली असता हे भोक पहाणी करणेसाठी किंवा गडावरील पाणी बाहेर काढणेसाठी असावे असे वाटते.

गुहेपासून वरती गेल्यावर आपण दुसऱ्या गुहेत येतो, इथे गुहेमध्ये राममंदिर वसवले आहे, पूर्ण कातळात कोरलेले हि गुहा फक्त 4 खांबावर अधांतरीत आहे, या गुहेच्या खाली एक पाण्याचे टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य व थंडगार आहे.
येतून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या पठारावरती येतो, येतून डाव्या बाजूला जाणार रस्ता मोकळ्या पाठरावरती जातो येथे पाण्याचे टाके पाहायला मिळतील. परत आपण मुख्य ठिकाणी यायचं, याच्या समोर एक छोटेखानी दरवाजा आहे जो खाली गुहेमध्ये जाण्यासाठी केला आहे. येतून गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उजव्या रस्त्याने जावे, याच्या उजव्या बाजूला तटबंदीमध्ये उत्कृष्ट असा दरवाजा कोरला आहे (हा गडाचा त्यावेळचा मुख्य दरवाजा होता) , आजही याच्या बांधणीचे नेमकं कारण समजू शकत नाही, हे छोटे खंदक नेमके कश्यासाठी बांधले कारण या खंदकातून खाली जाणार बोगदा गुहेमध्ये 2 फुटाचे भोक सर्व काही विचार करण्यासारखं बांधकाम आहे. येतून परत माघारी येऊन आपण बालेकिल्ल्यावर जावे, जाताना उजव्या बाजूला एक तलाव, तर त्याचा डाव्या बाजूला 5 पाण्याचे टाके आहेत, येतून वरती गेल्यावर आई भगवती चे मंदिर आहे, आतमध्ये सुबक शास्त्र धारण भगवतीची मूर्ती आहे. या मंदिरापासून वरती जात असताना उजव्या बाजूला पडक्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. येतून थोडे वर गेल्यावर डाव्या बाजूला 4 पाण्याचे टाके आहेत. आता आपण गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर जावे, या पठारावर मुख्य वाड्याचे पडलेले अवशेष आढळतात. बांधकाम चुन्या मध्ये केलेले दिसून येते.

येतून गडाच्या पूर्वेकडील तटबंदीकडे जावे येते आपल्याला 5-6 पाण्याची टाके आढळतील व यातून पाणी बाहेर काढण्यासाठी रहाट सारखी व्यवस्था केलेली दिसते, यातील एका टाक्यात पाण्यासाठी तयार केलेले दगडी भांडे आहे ( अशी दगडी भांडे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले महिपालगडावर आढळतात)
बाकी गडावर या व्यतिरिक्त आता काही शिल्लक नाही. येतून आजुबाजूचा परिसर न्याहाळायाचा व आपल्या बापजाद्यांनी मोघलांची कशी फजिती केली असेल याचा विचार करत परतीच्या मार्गाला लागावे.
गडाच्या पूर्वेस किल्ले भोरगड चे दर्शन होते.

◆ इतिहास-
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते. मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.
त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली. त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही.
मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.
शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्‍याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्‍या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा.त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसर्‍या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा. मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले.
किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले. एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली.
या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला.
त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

◆शब्दांकन व माहिती संकलन-
🖋 मनोज शिवाजीराव महाडिक.
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
♨9890354353
♨9156571313
manoj.swarajya96@gmail.com

बुधवार, २२ जून, २०१६

स्वर्गाचे द्वार - किल्ले रतनगड

🎪 धरतीवरचा स्वर्ग - किल्ले रतनगड 🎪

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

भंडारदरा धरण परीसरातील घनदाट झाडीमुळे व निसर्गाच्या अक्राळ विक्राळ कातळ कड्यांमुळे हा भाग मनामध्ये खूपच धडके भरवणारा आहे. एखाद्या राजाच्या मुकुटावरती जसा हिरा शोभून दिसावा त्याप्रमाणे कळसूबाई पर्वतरांगेतील हा किल्लाही तितकाच सुंदर उठून दिसतो.

नगर जिल्हा बेलाग किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे मग त्यामध्ये हरिश्चंद्रगड असो किंवा रतनगड असो, पावसाळ्यायमध्ये हे किल्ले ढगाला भोक पाडून वरती उठून दिसतात अशी यांची अवाढव्य उंची, सदैव धुके, थंडावा, निरव शांतता व पायथ्याशी जंगलात फक्त पक्ष्यांचा किलबिलाट....!!
नेहमीच्या धकाबुकीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येक शिवप्रेमीने आवर्जून बगावा असा हा किल्ला. स्वर्ग हि संकल्पना आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत पण ती काल्पनिक संज्ञा आहे, तुम्हाला जर खरोखरच स्वर्गाहुनीही सुंदर अस काही बगायचं असेल तर पावसाळ्यात हरिश्चंद्रगड किंवा रतनगड ला अवश्य भेट द्या, जीवनात सुंदरता काय असते याची प्रचिती फक्त इथे येऊन अनुभवण्यात आहे ती कुठेच पाहायला भेटणार नाही. धरतीवरती नारीला जरी जेवढी सुंदरता असेल त्यापेक्षाही हजारो पटींनी ठासून सुंदरता इथल्या दगड मातीत, काळ्या कातळात, त्या डोंगर कपाऱ्यातून घोंघावणाऱ्या वाऱ्याला, धुक्याचा प्रत्येक स्पर्श इथल्या दगड धोंड्याला होऊन त्यातून निथळणाऱ्या थेंबाला, मन कासावीस करणाऱ्या इथल्या परिसराला त्या पक्षांच्या किलबिलाटाला, इतिहासाच्या पराक्रमाची पदर असणाऱ्या गडतटांना, भक्कम बुरुजांना, 350 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या स्वराज्याच्या प्रत्येक शिलेदाराच्या पदस्पर्शाच्या कातळातील पायऱ्यांना....!!
इथल्या प्रत्येक गोष्टीला....प्रत्येक वस्तूला.

🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

रविवारी मान्सून मधील पहिला ट्रेक रतनगडापासून सुरु करायचा असे ठरवले व अचानक नियोजनही झाले, माझे कंपनिमधील सहकारी मित्रांची क्रिकेट टुर्नामेंट असलेमुळे कोणालाही रविवारी सवड मिळनार नव्हती, पण मला शनिवारी कंपनीतून रूम वर आले तरीही मन बेचैन झाले होते, मग नेहमीप्रमाणे ठरलेले असते कोणी आले तर ठीक नाहीतर एकला चलो. गडबडी मध्ये बॅग पॅक करुन एव्हाना गाडी बाहेर काढून 7 pm ला भंडारदरा च्या रस्त्याने मन सुसाट पळू लागले. नवीन भाग, चुकलेले रस्ते विचारत तर कधी टपरीवर चहा मारत संगमनेर मध्ये रात्रि 10 वाजता पोचलो, मस्त पैकी चिकन वर ताव मारून 10.30 वाजता पुढचा मार्ग चालू केला... नेवासा, श्रीरामपूर, प्रवरानगर, संगमनेर मार्गे अकोले मध्ये येऊन मुक्काम केला (आदिवासी भाग असलेमुळे रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास करू नये, भरपूर दुर्घटना घडल्या आहेत या भागात). सकाळी 5 वाजता उठून सूर्योदय पाहनेसाठी भंडारदरा गाठले ( अकोले ते भंडारदरा अंतर 45 km). भंडारदरा बॅकवाटर जलाशयातील भागात येऊन इथला परिसर न्याहाळत बसलो, सकाळी स्थानिक लोकांची गडबड, धरण काठावर टेंट लावून झोपलेले ट्रेकर्स....!!!!!

इथून पुढे 18 km वर गेल्यावर रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव येते. गाडी इथे पार्क करून या गावातील सुमारे 1200 वर्षापूर्वीचे पूर्ण काळ्या कातळात कोरलेले मनोहारी अमृतेश्वराचे मंदिर पहावे, अत्यंत सुबक हेमाडपंथी भक्कम बांधकाम आजही सुस्थितीत आहे. मंदिरावर विविध प्रकारच्या समुद्रमंथन, मुक्त शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाजूस पुष्कर्णी (बारव) आहे, यामध्ये मुर्त्यासाठी देवड्या आहेत, लरत्येक देवडीमध्ये विष्णू व गणेशाची शस्त्र धारण केलेल्या मुर्त्या आहेत. पुष्कर्णी पाहून गावातील लोकांना गडावर जाण्याचा मार्ग विचारून आपण आपला रस्ता चालता करायचा. रतनगड मुख्य रस्त्यापासून बराच आत डोंगररांगेच्या आड असलेमुळे तो लवकर ओळखू येत नाही, त्यामुळे रस्ता बरोबर विचारावा. घनदाट झाडीतून, प्रवरा नदीच्या उगमाकाठून मार्ग काढत, आदिवासी लोकांचे जीवनमान बघत गडाच्या मुख्य पायथ्याला येऊन पोचतो. इथून वर पहिले तरी तुम्हाला गडाचे मुख्य शिखर दिसणार नाही एवढी याची उंची व त्यात धुके त्यामुळे नीट अंदाज लागत नाही. हासऊस करत आपण गडाच्या पहिल्या पठारावर येऊन पोचतो, इथून प्रवरा नदी व आजूबाजूचा परिसर दिसतो. येथून सरळ उजव्या बाजूने जाणाऱ्या गडाच्या दुसऱ्या व खड्या रस्त्याने जंगलातून वाट काढत आपण जायचे. भर दिवसा आतमध्ये काळोख व झाडांच्या पानावर पडणार पावसाचा आवाज ऐकत, भर पावसात अंगातून घाम निघेल अशी चढाई, पावसामुळे निसरडा झालेली लाल माती यातून आपण दुसऱ्या पठारावर येतो, चित्रपटामध्ये जसे एखादा शक्तिशाली मनुष्य गायब होऊन एखाद्या अद्भुत दुनियेत येतो त्याप्रमाणे आपण जंगलातून आपण जेंव्हा दुसऱ्या पठारावर बाहेर येतो तेंव्हा समोरचे दृश्य पाहून मन भारावून जाते, आपल्या समोर उभा असतो तो रांगडा रतनगडाचा तिसरा टप्पा व त्यावर पांघरलेले धुके....अविलोभनिय दृश्य.

तिसऱ्या टप्प्यासाठी जाताना आपण एका माहिती फलकपाशी येऊन पोचतो, येतून डाव्या बाजूचा रस्ता हरिश्चंद्रगडकडे जातो तर सरळ रस्ता रातनगडावरील बालेकिल्ल्यावर जातो, आपण सरळ चालते झालो कि,  गडावर जाण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी शिडीजवळ येऊन पोचतो, इथून पुढचा प्रवास हा खूपच रोमांचकारी तितकाच भयानक व काळजीचा आहे कारण एकतर शिडी भरपूर हालते, पावसामूळे ती एकदम निसरडी झालेली असते, व शिडी संपली कि काळ्या कातळातल्या पायऱ्या लागतात त्यावरही पावसामूळे शेवाळ आलेले असते त्यामुळे या वाटेवर प्रत्येक पाऊल काळजीनेच टाकावे...!!
योग्य ती खबरदारी घेत आपण गडाच्या प्रथम दरवाजापशी येऊन पोचतो, इथून खाली पाहिल्यावर आपले डोळे फिरतात कि राव पहिल्या काळी लोक वरती कसे येत असतील तर, पूर्वी या वाटेवर खाली दोर सोडला जायचा व दोर ला धरून वर मावळे यायचे पण आता याठिकाणी सरकारने लोखंडी शिडी लावली आहे. हा गडाचा पहिला दरवाजा आहे, इथून वरती गेल्यावर डाव्या बाजूला गडाचा दुसरा दरवाजा लागतो तर ऊजव्या बाजूचा रस्ता हा गुहेतील मंदिराकडे जातो. आपण डाव्या बाजूने दुसऱ्या दरवाजात थांबावे, दरवाजावर गणपती, गरुड देवता, मस्त्य शिल्प अशी शिल्पे कोरलेली आहेत, येथून पुढे गेल्यावर आपण गडावरील गोल बुरुजाजवळ येतो, बुरुजाच्या पाठीमागे पाण्याची 3-4 पाण्याची टाके आहेत. गडाच्या डाव्या तटबंदीवरुन पुढे गेल्यावर साम्रद गावाकडून येणारा कोकण दरवाजा लागतो, ईथुन खाली जायचा मार्ग पूर्णपणे पडला आहे. इथून पुढे गेल्यावर पुन्हा गुहेसारखी 2 पाण्याचे टाके लागतील. याच मार्गावर पुढे 6-7 पाण्याची टाके एका रांगेत आहेत पण यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाहीये. याच रस्त्याने चढाई करून वर गेले कि आपण नैसर्गिक रित्या तयार झालेल्या नेढया जवळ येऊन पोचतो (नेढे म्हणजे काळ्या कातळाला पडलेले भोक) यातून थंड हवा वाहत असते, धुक्याच्या वेळेस येथील अनुभव खूप मजेशीर येतो. इथून आपल्याला आजूबाजूचे किल्ले अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा परिसर दिसतो. नेढा क्रॉस करून पुढच्या बाजूने डाव्या बाजूला खाली उतरावे, इथून आपल्याला 2 मार्ग लागतात, डाव्या बाजूला खुट्याखालचा दरवाजा आहे तर उजव्या बाजूचा मार्ग गुहेतील मंदिराकडे जातो. प्रथम आपण डाव्या बाजूच्या खुट्याखालच्या दरवाजाकडे जावे, किल्ल्यावरील सगळ्यात भयानक वाटणारा हा रस्ता आहे कारण काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, खाली खोल दरी, व पायर्यावर्ती शेवाळ वाढलेमूळे निसरड्या झालेल्या पायऱ्या. सर्व काही बांधकाम अचंबित करण्यासारखं. आता इथे सध्या रेलिंग लावले आहे पण पूर्वीच्या वेळेस मावळे कसे येत असतील हि नुसती कल्पनाच केलेली बरी. या दरवाजातून समोरील खुट्या सुळक्याचे दर्शन होते.
या दरवाजातून परत माघारी वर येऊन गडाच्या डाव्या बाजूने चालते व्हावे. पुढे गेल्यावर आपण गडाच्या अंतिम टप्प्यावर पोचतो, येथून चढाई केल्यावर बालेकिल्ल्यावर पोचतो, इथे 2 पाण्याची टाके आहेत. परत खाली उतरून आपण गोल बुरुजपाशी येतो, याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण गुहेतील मंदिराकडे जावे. इथे गुहेमध्ये मंदिर साकारलं आहे व याच्या पुढील बाजूस मोठी गुहा आहे, आतमध्ये खोल्या तयार केल्या आहेत, यामध्ये 100 माणसांची झोपायची सोय होऊ शकते. इथे आपल्याला नाश्त्याला खायची सोय होते, भर पावसात गुहेवरून पडणारे पाणी, काकूंच्या हातचा चहा पिण्यात एक वेगळीच मजा येते.
एकंदरीत किल्ले रतनगडाची सफर म्हणजे स्वर्गाहूनी कमी नाही.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

🖋 मनोज शिवाजीराव महाडिक
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
9156571313 / 9890354353

शुक्रवार, १० जून, २०१६

नेवरी वाडा

नेवरीतील नारायण आप्पाचा वाडा
●●●●●●●●●◆◆◆◆●●●●●●●●●●●

नेवरी गाव हे कडेगाव तालुक्यातील विविध कारणांमुळे प्रसिद्ध गाव (जिल्हा सांगली) , मग ते सध्याचे राजकीय दबदबा असेल किंवा पंचक्रोशीतील सर्वांत डेव्हलपड खेड असेल, लोकसंख्याही तशी गावची भरपूर त्यामुळे ज्या बाजूने नेवरीकर झुकतील त्याचाच गुलाल आमदारकीसाठी किंवा इतर पदांसाठी व्हायचा हा इतिहास आहे.

तसेच गावाला ऐतिहासिक वारसा हि लाभला आहे, छ. शिवरायांचे जावई सरसेनापती. हरजीराजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी महाडिक यांनी वसवलेले गाव म्हणूनही या गावाकडे पहिले जाते. आजही गावच्या दक्षिण बाजूला ऐतिहासिक बारव , आमराई, व बाजूला हत्तीकुंड पाहायला मिळतो.  कालांतराने मुलुख वर्चस्वाने या गावात  महाडिक व इंगवले यांच्यात सत्ता संघर्ष झाला व इंगवले लोकांना हे गाव सोडून जावे लागले (सध्या हे लोक कराड जवळील रिसवड या गावात राहतात)

गावामध्ये पूर्वीच्या काळचे भरपूर वाडे होते पण कालांतराने काही नष्ट केले गेले तर काही वाडे आजही आपले आस्तित्व , इतिहास टिकवून आहेत. गावामध्ये गोडवनाजवळ नारायण आप्पाचा वाडा, त्याच्या बाजूलाच पाटलांचा वाडा, चिंचनकर आळीला ब्राह्मणाचा वाडा, गणेश चौकातील वाडा, पिराच्या वाड्यात 1-2 वाडे आहेत. सध्या मात्र यातील थोडेसेच चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

आपण या वाडयांच्या बांधणीबद्दल थोडी माहिती घेऊया, गोडवणाजवळील नारायण आप्पाच्या वाडा हा आजही चांगल्या अवस्थेत आहे, वाड्याचे निरीक्षण केले असता असे निदर्शनास येते कि हे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये झाले असून, दरवाजाच्या वरती शिल्प कोरले आहेत (पूर्वी एक पद्धत होती कि ज्या काळात बांधकाम होईल त्या काळातील एक घोषित चिन्ह त्या बांधकामावर कोरले जायचे)
या शिल्पामध्ये शरभ (वाघ व सिंहाचे प्रजननातुन निर्माण झालेला प्राणी) दाखवला आहे, शरभाच्या पायामध्ये हत्ती दाखवला आहे (हत्तीची शिकार), मध्यभागी कुंभ दाखवला आहे. हे शिल्प शिवकाळातील प्रत्येक किल्ल्यावरील दरवाजावरती आपणास पाहायला मिळते याचा अर्थ हे बांधकाम हि शिवकाळातीलच आहे ( या चिन्हाचा अर्थ त्या राज्यामध्ये कोनत्याही सत्तेबरोबर संघर्ष करण्याची ताकद (शरभ) , राज्यामध्ये भरभराटी येवो (कुंभ) असा त्याचा अर्थ होतो)

वाड्याची रचनाही नियोजन बद्ध आहे, दरवाजा लाकडी आहे तर आतमधून रात्रीचे वेळीस दरवाजा बंद करणेसाठी लाकडी ओंडका आतमधून लावण्याची सोय आहे, चोहो बाजूने दगडी भिंत आहेत व आतमध्ये एका ओळीत घरांचे माती बांधकाम, समोर लहान मुलांना खेळण्यासाठी आंगण, पाण्यासाठी मोहरी, मौल्यवान वस्तू दडवून ठेवण्यासाठी खोदलेले प्याव (भुयारी खोली), व घरांवरती कंभरभर  मातीचे छत ज्यामुळे घर पावसाळ्यात गरम राहायचे तर उन्हाळ्यात थंड. अप्रतिम बांधकाम.
सलाम त्या कारागिरांना.....!!!

🖋मनोज महाडिक
      9156571313