स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

गुरुवार, ५ मे, २०२२

नेवरीतील (जि. सांगली) ऐतिहासिक बारव.

नेवरीचा ऐतिहासिक प्राचीन ठेवा !

ऐतिहासिक परंपरा लाभलेलं गाव म्हणून नेवरी गाव सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या अंबिकाबाईंचा विवाह महाडीक घराण्यातील शूरवीर सरसेनापती हरजीराजे महाडीक यांच्याशी झाला, महाडीक घराण्याला तारळे (जि. सातारा) येथील 7 गावांची वतनकी छ. शाहूमहाराजांच्या काळात  देण्यात आली होती, मुलुख विस्तार करताना सरसेनापती हरजीराजेंचे बंधू व्यंकोजीराजे हे सध्या नेवरी गावातील येरळेकाठी येवून काही दिवस स्थायिक झाले, भौगोलिकदृष्टीने समृध्द असणाऱ्या या परिसरात व्यंकोजीराजेंनी नेवरी गावात त्याकाळी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय व्हावी म्हणून बारव बांधली, त्याच्याच बाजूला आमराईची निर्मिती केली, हत्ती व घोड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हत्तीकुंड बांधले, गावात काही वाडे बांधले, धार्मिक पूजेसाठी गावातील हेमाडपंती महादेव मंदिराची डागडुजी केली.

बारवाना इतिहासात खूप मोठं महत्व आहे, प्रत्येक शासकाने आपआपल्या सोयीने जमेल तश्या बारव बांधून लोकांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा स्रोत उभा केला.


नेवरीतील बारव ही भद्रा प्रकारात मोडणारी असून, यात उतरण्यासाठी पूर्व- पश्चिम बाजूला पायऱ्या आहेत, याचे बांधकाम 3 टप्प्यात झाले असून सर्वात वरील टप्प्यामध्ये देव देवतांच्या मूर्तीसाठी 12 देवकोष्टके दिसत आहेत, यात सप्तमातृका व नागदेवतेच्या प्रतिमा पहायला मिळतात. भक्कम असे दगड एकमेकांत सांधत बारवेची बांधणी केली असून, याच बारवेतून आमराईसाठी व पाळीव पशूंना पाण्याची सोय व्हावी म्हणून यावरती मोटेची बांधणी केलेली दिसत आहे, अजूनही या मोटेवर वर्षानुवर्षे पाणी उपसल्याच्या मोटेचे दोरे घासून झालेल्या खुणा पाहायला मिळतात. हत्ती कुंड, दगडी हौद याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या बारवेतील पाणी कितीही दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही एवढी त्याची बांधणी भक्कम व अभ्यासपूर्ण केली आहे. बारवेच्या बाजूला सुंदर असे पूर्वाभिमुख महादेव मंदिर आहे व मंदिराच्या बाहेर शूर वीरांच्या विरगळीही आपल्याला दिसून येतात.

याबरोबर गावच्या मध्यभागी असणाऱ्या हेमाडपंती महादेव मंदिराची रचना पाहण्यासारखी आहे,  सुंदर असे मंदीर महादेवाच्या सुंदर अश्या पिंडीने शोभून दिसते, भर उन्हाळ्यात आत गारवा व हिवाळ्यात गाभाऱ्यात गरम असे वातावरण दगडातील बांधकामामुळे दिसून येते. झीज झालेला नंदी, द्वारपाल, विरगळी आजही इतिहासाची मूक साक्ष देत उभा आहेत.

गावात आजही भक्कम असे काही वाडे उभा आहेत ज्यावर शरभ व कुंभ अशी राजवैभवाची चिन्हे आजही दिसून येतात, नुकतंच मागील वर्षी मंदिर परिसरात उत्खनन करताना वीर योध्याचे एकमेव शिल्प सापडले, असे शिल्प महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळते.

एकंदरीत इतिहासाचा वारसा नेवरी गावाला लाभलेला आहे तो जरूर सर्वानी पहावा व त्याचे जतनही करायला सर्वांनी हातभार आपली जबाबदारी नात्याने लावला पाहीजेल.

✒️
श्री.मनोज शिवाजीराव महाडीक
संस्थापक/अध्यक्ष, स्वराज्य योद्धा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य
9697008383