🎪 धरतीवरचा स्वर्ग - किल्ले रतनगड 🎪
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
भंडारदरा धरण परीसरातील घनदाट झाडीमुळे व निसर्गाच्या अक्राळ विक्राळ कातळ कड्यांमुळे हा भाग मनामध्ये खूपच धडके भरवणारा आहे. एखाद्या राजाच्या मुकुटावरती जसा हिरा शोभून दिसावा त्याप्रमाणे कळसूबाई पर्वतरांगेतील हा किल्लाही तितकाच सुंदर उठून दिसतो.
नगर जिल्हा बेलाग किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे मग त्यामध्ये हरिश्चंद्रगड असो किंवा रतनगड असो, पावसाळ्यायमध्ये हे किल्ले ढगाला भोक पाडून वरती उठून दिसतात अशी यांची अवाढव्य उंची, सदैव धुके, थंडावा, निरव शांतता व पायथ्याशी जंगलात फक्त पक्ष्यांचा किलबिलाट....!!
नेहमीच्या धकाबुकीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येक शिवप्रेमीने आवर्जून बगावा असा हा किल्ला. स्वर्ग हि संकल्पना आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत पण ती काल्पनिक संज्ञा आहे, तुम्हाला जर खरोखरच स्वर्गाहुनीही सुंदर अस काही बगायचं असेल तर पावसाळ्यात हरिश्चंद्रगड किंवा रतनगड ला अवश्य भेट द्या, जीवनात सुंदरता काय असते याची प्रचिती फक्त इथे येऊन अनुभवण्यात आहे ती कुठेच पाहायला भेटणार नाही. धरतीवरती नारीला जरी जेवढी सुंदरता असेल त्यापेक्षाही हजारो पटींनी ठासून सुंदरता इथल्या दगड मातीत, काळ्या कातळात, त्या डोंगर कपाऱ्यातून घोंघावणाऱ्या वाऱ्याला, धुक्याचा प्रत्येक स्पर्श इथल्या दगड धोंड्याला होऊन त्यातून निथळणाऱ्या थेंबाला, मन कासावीस करणाऱ्या इथल्या परिसराला त्या पक्षांच्या किलबिलाटाला, इतिहासाच्या पराक्रमाची पदर असणाऱ्या गडतटांना, भक्कम बुरुजांना, 350 वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या स्वराज्याच्या प्रत्येक शिलेदाराच्या पदस्पर्शाच्या कातळातील पायऱ्यांना....!!
इथल्या प्रत्येक गोष्टीला....प्रत्येक वस्तूला.
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
रविवारी मान्सून मधील पहिला ट्रेक रतनगडापासून सुरु करायचा असे ठरवले व अचानक नियोजनही झाले, माझे कंपनिमधील सहकारी मित्रांची क्रिकेट टुर्नामेंट असलेमुळे कोणालाही रविवारी सवड मिळनार नव्हती, पण मला शनिवारी कंपनीतून रूम वर आले तरीही मन बेचैन झाले होते, मग नेहमीप्रमाणे ठरलेले असते कोणी आले तर ठीक नाहीतर एकला चलो. गडबडी मध्ये बॅग पॅक करुन एव्हाना गाडी बाहेर काढून 7 pm ला भंडारदरा च्या रस्त्याने मन सुसाट पळू लागले. नवीन भाग, चुकलेले रस्ते विचारत तर कधी टपरीवर चहा मारत संगमनेर मध्ये रात्रि 10 वाजता पोचलो, मस्त पैकी चिकन वर ताव मारून 10.30 वाजता पुढचा मार्ग चालू केला... नेवासा, श्रीरामपूर, प्रवरानगर, संगमनेर मार्गे अकोले मध्ये येऊन मुक्काम केला (आदिवासी भाग असलेमुळे रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास करू नये, भरपूर दुर्घटना घडल्या आहेत या भागात). सकाळी 5 वाजता उठून सूर्योदय पाहनेसाठी भंडारदरा गाठले ( अकोले ते भंडारदरा अंतर 45 km). भंडारदरा बॅकवाटर जलाशयातील भागात येऊन इथला परिसर न्याहाळत बसलो, सकाळी स्थानिक लोकांची गडबड, धरण काठावर टेंट लावून झोपलेले ट्रेकर्स....!!!!!
इथून पुढे 18 km वर गेल्यावर रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव येते. गाडी इथे पार्क करून या गावातील सुमारे 1200 वर्षापूर्वीचे पूर्ण काळ्या कातळात कोरलेले मनोहारी अमृतेश्वराचे मंदिर पहावे, अत्यंत सुबक हेमाडपंथी भक्कम बांधकाम आजही सुस्थितीत आहे. मंदिरावर विविध प्रकारच्या समुद्रमंथन, मुक्त शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाजूस पुष्कर्णी (बारव) आहे, यामध्ये मुर्त्यासाठी देवड्या आहेत, लरत्येक देवडीमध्ये विष्णू व गणेशाची शस्त्र धारण केलेल्या मुर्त्या आहेत. पुष्कर्णी पाहून गावातील लोकांना गडावर जाण्याचा मार्ग विचारून आपण आपला रस्ता चालता करायचा. रतनगड मुख्य रस्त्यापासून बराच आत डोंगररांगेच्या आड असलेमुळे तो लवकर ओळखू येत नाही, त्यामुळे रस्ता बरोबर विचारावा. घनदाट झाडीतून, प्रवरा नदीच्या उगमाकाठून मार्ग काढत, आदिवासी लोकांचे जीवनमान बघत गडाच्या मुख्य पायथ्याला येऊन पोचतो. इथून वर पहिले तरी तुम्हाला गडाचे मुख्य शिखर दिसणार नाही एवढी याची उंची व त्यात धुके त्यामुळे नीट अंदाज लागत नाही. हासऊस करत आपण गडाच्या पहिल्या पठारावर येऊन पोचतो, इथून प्रवरा नदी व आजूबाजूचा परिसर दिसतो. येथून सरळ उजव्या बाजूने जाणाऱ्या गडाच्या दुसऱ्या व खड्या रस्त्याने जंगलातून वाट काढत आपण जायचे. भर दिवसा आतमध्ये काळोख व झाडांच्या पानावर पडणार पावसाचा आवाज ऐकत, भर पावसात अंगातून घाम निघेल अशी चढाई, पावसामुळे निसरडा झालेली लाल माती यातून आपण दुसऱ्या पठारावर येतो, चित्रपटामध्ये जसे एखादा शक्तिशाली मनुष्य गायब होऊन एखाद्या अद्भुत दुनियेत येतो त्याप्रमाणे आपण जंगलातून आपण जेंव्हा दुसऱ्या पठारावर बाहेर येतो तेंव्हा समोरचे दृश्य पाहून मन भारावून जाते, आपल्या समोर उभा असतो तो रांगडा रतनगडाचा तिसरा टप्पा व त्यावर पांघरलेले धुके....अविलोभनिय दृश्य.
तिसऱ्या टप्प्यासाठी जाताना आपण एका माहिती फलकपाशी येऊन पोचतो, येतून डाव्या बाजूचा रस्ता हरिश्चंद्रगडकडे जातो तर सरळ रस्ता रातनगडावरील बालेकिल्ल्यावर जातो, आपण सरळ चालते झालो कि, गडावर जाण्यासाठी तयार केलेल्या लोखंडी शिडीजवळ येऊन पोचतो, इथून पुढचा प्रवास हा खूपच रोमांचकारी तितकाच भयानक व काळजीचा आहे कारण एकतर शिडी भरपूर हालते, पावसामूळे ती एकदम निसरडी झालेली असते, व शिडी संपली कि काळ्या कातळातल्या पायऱ्या लागतात त्यावरही पावसामूळे शेवाळ आलेले असते त्यामुळे या वाटेवर प्रत्येक पाऊल काळजीनेच टाकावे...!!
योग्य ती खबरदारी घेत आपण गडाच्या प्रथम दरवाजापशी येऊन पोचतो, इथून खाली पाहिल्यावर आपले डोळे फिरतात कि राव पहिल्या काळी लोक वरती कसे येत असतील तर, पूर्वी या वाटेवर खाली दोर सोडला जायचा व दोर ला धरून वर मावळे यायचे पण आता याठिकाणी सरकारने लोखंडी शिडी लावली आहे. हा गडाचा पहिला दरवाजा आहे, इथून वरती गेल्यावर डाव्या बाजूला गडाचा दुसरा दरवाजा लागतो तर ऊजव्या बाजूचा रस्ता हा गुहेतील मंदिराकडे जातो. आपण डाव्या बाजूने दुसऱ्या दरवाजात थांबावे, दरवाजावर गणपती, गरुड देवता, मस्त्य शिल्प अशी शिल्पे कोरलेली आहेत, येथून पुढे गेल्यावर आपण गडावरील गोल बुरुजाजवळ येतो, बुरुजाच्या पाठीमागे पाण्याची 3-4 पाण्याची टाके आहेत. गडाच्या डाव्या तटबंदीवरुन पुढे गेल्यावर साम्रद गावाकडून येणारा कोकण दरवाजा लागतो, ईथुन खाली जायचा मार्ग पूर्णपणे पडला आहे. इथून पुढे गेल्यावर पुन्हा गुहेसारखी 2 पाण्याचे टाके लागतील. याच मार्गावर पुढे 6-7 पाण्याची टाके एका रांगेत आहेत पण यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाहीये. याच रस्त्याने चढाई करून वर गेले कि आपण नैसर्गिक रित्या तयार झालेल्या नेढया जवळ येऊन पोचतो (नेढे म्हणजे काळ्या कातळाला पडलेले भोक) यातून थंड हवा वाहत असते, धुक्याच्या वेळेस येथील अनुभव खूप मजेशीर येतो. इथून आपल्याला आजूबाजूचे किल्ले अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा परिसर दिसतो. नेढा क्रॉस करून पुढच्या बाजूने डाव्या बाजूला खाली उतरावे, इथून आपल्याला 2 मार्ग लागतात, डाव्या बाजूला खुट्याखालचा दरवाजा आहे तर उजव्या बाजूचा मार्ग गुहेतील मंदिराकडे जातो. प्रथम आपण डाव्या बाजूच्या खुट्याखालच्या दरवाजाकडे जावे, किल्ल्यावरील सगळ्यात भयानक वाटणारा हा रस्ता आहे कारण काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, खाली खोल दरी, व पायर्यावर्ती शेवाळ वाढलेमूळे निसरड्या झालेल्या पायऱ्या. सर्व काही बांधकाम अचंबित करण्यासारखं. आता इथे सध्या रेलिंग लावले आहे पण पूर्वीच्या वेळेस मावळे कसे येत असतील हि नुसती कल्पनाच केलेली बरी. या दरवाजातून समोरील खुट्या सुळक्याचे दर्शन होते.
या दरवाजातून परत माघारी वर येऊन गडाच्या डाव्या बाजूने चालते व्हावे. पुढे गेल्यावर आपण गडाच्या अंतिम टप्प्यावर पोचतो, येथून चढाई केल्यावर बालेकिल्ल्यावर पोचतो, इथे 2 पाण्याची टाके आहेत. परत खाली उतरून आपण गोल बुरुजपाशी येतो, याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण गुहेतील मंदिराकडे जावे. इथे गुहेमध्ये मंदिर साकारलं आहे व याच्या पुढील बाजूस मोठी गुहा आहे, आतमध्ये खोल्या तयार केल्या आहेत, यामध्ये 100 माणसांची झोपायची सोय होऊ शकते. इथे आपल्याला नाश्त्याला खायची सोय होते, भर पावसात गुहेवरून पडणारे पाणी, काकूंच्या हातचा चहा पिण्यात एक वेगळीच मजा येते.
एकंदरीत किल्ले रतनगडाची सफर म्हणजे स्वर्गाहूनी कमी नाही.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
🖋 मनोज शिवाजीराव महाडिक
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
9156571313 / 9890354353
कडक मनोज
उत्तर द्याहटवाकडक मनोज
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा