महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण
कर्नाटक प्रांतात कोल्हापूरच्या छत्रपतींचा वाढता दबदबा पेशव्यांच्या राजकारणास धोका निर्माण करत होता. मात्र सातारचे छत्रपती रामराजे हयात असेपर्यंत पेशव्यांना कोल्हापूर राज्याविरुद्ध थेट लढाई करणे शक्य नव्हते. डिसेंबर १७७७ साली छत्रपती रामराजे निधन पावले आणि यानंतर एक महिना उलटण्याच्या आधीच पेशव्यांनी कोल्हापूर राज्यावर फौज घातली.
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. जानेवारी १७७८ साली केवळ कोल्हापूर शहरच नव्हे तर संपूर्ण करवीर राज्यच ताब्यात घेण्याच्या उद्देशाने तीस हजारांची प्रचंड फौज घेऊन पेशव्यांचा सरदार महादजी छत्रपतींच्या राजधानीवर चालून आला. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वीस वर्षांचे होते. त्यामुळे राज्याची संपूर्ण लष्करी जबाबदारी येसाजी शिंदे यांच्यावर होती. महादजीच्या तीस हजार फौजेशी युद्ध करणे प्रचंड नुकसानकारक ठरणार होते. त्यामुळे छत्रपतींचे सेनापती येसाजी शिंदे यांनी महादजींकडे बोलणी लावली. दोन लाख रुपये देऊन महादजीला वाटेतूनच पुण्याला परत पाठवून द्यावे असा येसाजींचा बेत होता. मात्र महादजीने हि बोलणी धुडकावून लावत तब्बल तीस लाख रुपयांची मागणी केली. हि मागणी पाहून जास्त काही न बोलता सेनापती येसाजींनी कोल्हापूर राज्याची फौजच तयार ठेवली. दि. १३ जानेवारी १७७८ रोजी महादजीची फौज कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचली. मात्र कोल्हापूरची बुरुजबंद तटबंदी भेदून शहरात घुसणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे महादजीने कोल्हापूरास वेढा घातला. राजमाता, छत्रपती महाराज व संपूर्ण राजकुटूंब शहरातच होते. त्याचदिवशी छत्रपतींचे सरदार सटवाजी भोसले तीन हजार फौजेसह गनिमी काव्याने वेढ्यावर हल्ला करुन शहरात परतले. महादजीने कोल्हापूरच्या चारी बाजूंस तोफा व मोर्चे लावले, शहराची नाकेबंदी करुन शहरात जाणाऱ्या निरपराध लोकांना ठार मारले. तोफांचा मारा करुन तटबंदी भेदण्याचा प्रयत्न करु लागले. पण कोल्हापूरच्या अभेद्य तटबंदीपुढे महादजीच्या तोफा कुचकामी ठरत होत्या. सेनापती येसाजी शिंद्यांनी म्हैसूरच्या हैदर अलीकडे पत्र पाठवून रसद मागितली. हैदरनेही "घाबरे न होणे. आम्ही फौज पाठवतो. हिंमत न सोडावी." म्हणून पत्र पाठवले. महादजीलाही कोल्हापूर लढून घेणे शक्य नव्हते. शिवाय बाहेरुन म्हैसूरची फौज आल्यास महादजीची कोंडी होणार होती. त्यामुळे फितुरीने काही साध्य करता येते का याची चाचपणी करु लागले. पण तेदेखील साध्य झाले नाही. महादजीने शहराबाहेरील व्यापारीपेठा जाळून टाकल्या. छत्रपतींच्या रयतेस होईल तेवढी तोशिस देऊ लागले. रोज तोफांचा मारा तटबंदीवर होत होता. आता थेट शहरातच तोफा डागल्या जाऊ लागल्या. निरपराध लोक मरत होते पण महादजी शिंदे तीस लाख रुपये द्या म्हणून अडून बसले होते. वर "कोल्हापूर तर घेतोच आणि पन्हाळगड पण घेतो" अशा छत्रपतींना धमक्या देत होते. तटबंदी भेदण्यासाठी महादजीने पुण्याहून "महांकाळी" तोफ मागवली. पत्रांवर पत्रे पाठवूनही तोफ काही येईना. तेवढ्यात हैदरअलीने छत्रपतींना पाच लाख रुपये पाठवून दिल्याची बातमी महादजीला समजली. हि बातमी कितपत खरी हे समजावयास मार्ग नाही. महादजीची सारी भिस्त आता महांकाळी तोफेवर असल्याने ती येईपर्यंत त्यांनी लढाईची तीव्रता कमी केली. मात्र निरनिराळ्या मार्गांनी येसाजी शिंदेंना उपद्रव देण्याचे सुरुच ठेवले.
यादरम्यान महादजीने एक अघोरी मार्ग अवलंबला. राजधानी कोल्हापूरात छत्रपतींची जी फौज होती त्यांची घरेदारे आसपासच्या खेड्यांत विखुरलेली होती. त्यांचा शोध घेऊन त्यांच्या बायकापोरांना त्रास देण्याचे, त्यांची घरे जप्त करुन उध्वस्त करण्याचे सत्र महादजीने सुरु केले. या प्रकारामुळे सटवाजी भोसल्यांनी पुन्हा एकदा फौज घेऊन शहराच्या बाहेर येऊन महादजीवर हल्ला चढवला. शहरातून महादजीच्या फौजेवर तोफांचा मारा होऊ लागला. छत्रपतींच्या फौजेची घरेदारे जप्त करुन त्यांच्या पोराबाळांना, म्हाताऱ्या आईबापाला उघड्यावर आणण्याच्या महादजीच्या निंदनीय कृत्यामुळे छत्रपतींची फौज अधिकच त्वेषाने पेटून उठली. २८ फेब्रुवारी १७७८ रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.
परकीयांची चाकरी करणाऱ्या समस्त मराठ्यांना स्वातंत्र्याचा सूर्य दाखविणाऱ्या श्री शिवप्रभूंनी स्थापन केलेली हि छत्रपतींची गादी. या गादीवर बसणारे 'महाराज छत्रपती' म्हणजे सर्व क्षत्रियांचे प्रमुख, हिंदूंचे एकमेव 'हिंदूपदपातशहा'. या छत्रपतींच्या गादीविरोधात जाऊन, खुद्द छत्रपतींच्या राजधानीवर आक्रमण करुन महादजी शिंद्याने छत्रपतींकडून खंडणी उकळली. निष्पाप प्रजेची कत्तल केली. पूर्वी आदिलशहा, मुघल याहून वेगळे काय करायचे ? पण अशाही बिकट परिस्थितीत ज्यांनी हे प्रकरण अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळले, ज्यांच्यावर करवीर राज्याची संपूर्ण भीस्त होती ते सेनाखासखेल श्रीमंत येसाजी शिंदे यांच्या स्वामीनिष्ठेचे व श्रीमंत सटवाजी भोसले व त्यांच्या अज्ञात मावळ्यांच्या असिम शौर्याचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
शत्रूने जरी आपली मर्यादा सोडून आपल्या घरादाराला त्रास दिला तरीदेखील छत्रपतींवरील आपली निष्ठा ढळू न देणाऱ्या शूर मावळ्यांना मुजरा...
छत्रपतींवर चालून आलेल्या महादजी #शिंदे यांना रोखणाऱ्या #छत्रपतीनिष्ठ येसाजी #शिंदे यांना मुजरा...
#KarvirRiyasatFB #करवीर_राज्य
संदर्भ -
मराठी रियासत उत्तर विभाग भाग १
करवीर रियासत चौथी आवृत्ती
करवीर रियासतीची कागदपत्रे खंड १, ले. २५
Satara Historical Research Society : Book ll
कोल्हापूर प्रांताचा अर्वाचीन इतिहास (मोडक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा