स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

गुरुवार, ५ मे, २०२२

नेवरीतील (जि. सांगली) ऐतिहासिक बारव.

नेवरीचा ऐतिहासिक प्राचीन ठेवा !

ऐतिहासिक परंपरा लाभलेलं गाव म्हणून नेवरी गाव सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या अंबिकाबाईंचा विवाह महाडीक घराण्यातील शूरवीर सरसेनापती हरजीराजे महाडीक यांच्याशी झाला, महाडीक घराण्याला तारळे (जि. सातारा) येथील 7 गावांची वतनकी छ. शाहूमहाराजांच्या काळात  देण्यात आली होती, मुलुख विस्तार करताना सरसेनापती हरजीराजेंचे बंधू व्यंकोजीराजे हे सध्या नेवरी गावातील येरळेकाठी येवून काही दिवस स्थायिक झाले, भौगोलिकदृष्टीने समृध्द असणाऱ्या या परिसरात व्यंकोजीराजेंनी नेवरी गावात त्याकाळी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय व्हावी म्हणून बारव बांधली, त्याच्याच बाजूला आमराईची निर्मिती केली, हत्ती व घोड्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हत्तीकुंड बांधले, गावात काही वाडे बांधले, धार्मिक पूजेसाठी गावातील हेमाडपंती महादेव मंदिराची डागडुजी केली.

बारवाना इतिहासात खूप मोठं महत्व आहे, प्रत्येक शासकाने आपआपल्या सोयीने जमेल तश्या बारव बांधून लोकांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा स्रोत उभा केला.


नेवरीतील बारव ही भद्रा प्रकारात मोडणारी असून, यात उतरण्यासाठी पूर्व- पश्चिम बाजूला पायऱ्या आहेत, याचे बांधकाम 3 टप्प्यात झाले असून सर्वात वरील टप्प्यामध्ये देव देवतांच्या मूर्तीसाठी 12 देवकोष्टके दिसत आहेत, यात सप्तमातृका व नागदेवतेच्या प्रतिमा पहायला मिळतात. भक्कम असे दगड एकमेकांत सांधत बारवेची बांधणी केली असून, याच बारवेतून आमराईसाठी व पाळीव पशूंना पाण्याची सोय व्हावी म्हणून यावरती मोटेची बांधणी केलेली दिसत आहे, अजूनही या मोटेवर वर्षानुवर्षे पाणी उपसल्याच्या मोटेचे दोरे घासून झालेल्या खुणा पाहायला मिळतात. हत्ती कुंड, दगडी हौद याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या बारवेतील पाणी कितीही दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही एवढी त्याची बांधणी भक्कम व अभ्यासपूर्ण केली आहे. बारवेच्या बाजूला सुंदर असे पूर्वाभिमुख महादेव मंदिर आहे व मंदिराच्या बाहेर शूर वीरांच्या विरगळीही आपल्याला दिसून येतात.

याबरोबर गावच्या मध्यभागी असणाऱ्या हेमाडपंती महादेव मंदिराची रचना पाहण्यासारखी आहे,  सुंदर असे मंदीर महादेवाच्या सुंदर अश्या पिंडीने शोभून दिसते, भर उन्हाळ्यात आत गारवा व हिवाळ्यात गाभाऱ्यात गरम असे वातावरण दगडातील बांधकामामुळे दिसून येते. झीज झालेला नंदी, द्वारपाल, विरगळी आजही इतिहासाची मूक साक्ष देत उभा आहेत.

गावात आजही भक्कम असे काही वाडे उभा आहेत ज्यावर शरभ व कुंभ अशी राजवैभवाची चिन्हे आजही दिसून येतात, नुकतंच मागील वर्षी मंदिर परिसरात उत्खनन करताना वीर योध्याचे एकमेव शिल्प सापडले, असे शिल्प महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळते.

एकंदरीत इतिहासाचा वारसा नेवरी गावाला लाभलेला आहे तो जरूर सर्वानी पहावा व त्याचे जतनही करायला सर्वांनी हातभार आपली जबाबदारी नात्याने लावला पाहीजेल.

✒️
श्री.मनोज शिवाजीराव महाडीक
संस्थापक/अध्यक्ष, स्वराज्य योद्धा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य
9697008383

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

गडकोट

गडकोट !

मराठ्यांच्या जाज्वल इतिहासामद्धे आपल्या पराक्रमाने जेवढा मावळ्यांनी इतिहास रचला तसाच इतिहास या गडकोटांचा आहे. आपल्या बुलंद, बेलाग आणि भक्कमतेने सहयाद्रीच्या कुशीत येऊन शत्रूला लढणे मुश्किल व्हायचे. सह्याद्री म्हंटल की नजरेसमोर उभा राहतो तो रौद्र अवतार, किर्रर्रर करणारी जंगल संपदा, विशाल चखोट कडे, इथे वाऱ्यालाही फिरण्याची अनुमती नाही असं भयंकर वातावरण !

छत्रपती शिवरायांनी याच भौगोलीकतेचा वापर करून नैसर्गिक कडे कपारे, डोंगरांना आकार देऊन गडकोटांची निर्मिती केली, इथली भयानकता एवढी आहे की जावळी सारख्या खोऱ्यात शिरल्यावर शत्रूला दिवसा कापरे भरत असत, आणि याच नैसर्गिकतेचा फायदा घेऊन उदयास आला तो गनिमिकाव्याचा प्रकार ! कमीत कमी सैन्य असताना निसर्गाची साथ घेऊन शत्रूला पाणी पाजणारी औलाद ही याच दरीखोऱ्यातील मातीत घडली !

मराठ्यांनी ज्यांच्या जिवावर अनेक दशके विविध बलाढ्य शाह्यांविरुद्ध आक्रमकपणे राज्य केले ते म्हणजे इथले "गडकोट". मराठ्यांच्या इतिहासाची, पराक्रमाची कवच कुंडल, मराठ्यांच्या अस्मितेची हीच ती धारतीर्थे.

ज्या राक्षसाने अफगाण मधून येऊन कमी कालावधीमध्ये दिल्ली काबीज केली त्याला महाराष्ट्र जिंकायला आपलं म्हातारपण आपलं आजारपण येईपर्यंत वाट पाहावी लागली, त्यातील काही जणांना या मराठांच्या पराक्रमी मातीत मराठ्यांनी गाढले. इथे शिव शंभुच्या लखलखत्या तलवारीने व ओजस्वी स्वाभिमानाने तयार झालेला एक एक मावळा शत्रूच्या 10-10 सैन्याला भारी होता, इथे तयार झालेला प्रत्येक मावळा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या धन्यासाठी, आपल्या मातीसाठी मरण पाठीवर घेऊन लढत होता, वर्षोनुवर्षे भरडला जाणारा मराठा आपला स्वाभिमान नाईलाजाने व काही स्वार्थी स्वकीयांमुळे गहाण ठेवून होता, पण आई  जिजाऊनी या मातीला एक शिवरूपी हिरा दिला आणि याच तेजस्वी तळपणाऱ्या हिऱ्याने अवघा मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा बुलंद केला तो कायमचाच !

शिवरायांनी आपली ध्येयधोरणे निश्चित करताना ती अमलांत आणली, आपल्याला भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव होणारा व त्यादृष्टीने पाऊल उचलनारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवराय. शिवरायांनी या गडकिल्ल्यांना लढाई च्या दृष्टीने बांधकाम करून घेऊन अजून भक्कम बनवून टाकलं होतं. कित्येक किल्ले हे राजा भोज शिलाहार यांच्या काळातील होते पण या किल्य्यांमध्ये आपली बौद्धिक प्रगल्भता वापरून त्याची डागडुजी केली, गोमुखी दरवाजे, भक्कम टेहळणी बुरुज, लढाऊ बुरुज व बुरुजावर झरोके, जंग्याची निर्मिती केली. तटबंदीच्या आत चिलखती तट, बुरुजाआत देवड्या, दिंडी दरवाजे, चोर दरवाजे यांची अतिशय उपयुक्त बांधणी केली.

अश्या या गडकोटांची सध्या उपहासना चालू आहे, चालू पिढीमध्ये असलेली इतिहासाबद्दल अनावस्था, प्रशासनाच सोयीपुरतच राजकारण, गडांवर सध्या होणारे कारनामे हे इतिहासाचं विकृतीकरण व हानिकारक आहे, अश्या प्रकारांमुळे आपणच आपल्या जाज्ज्वल इतिहासाची हानी करत आहोत, त्यासाठी प्रत्येकांनी जागरूक झाले पाहिजेल. इतिहासाची कोणी हानी करू पाहत असेल तर त्याला वेळीच जाग्यावर थोपवून ठोकलं पाहिजेल. गडकिल्ले म्हणजे कोना ऐरागैऱ्याच अड्डे नव्हेत, गडकिल्ले घडवायला आपल्या बापजाद्यानी रक्ताचा अभिषेक या मातीत केलाय, कित्येक आता बहिणींच कुंकू याच मातीसाठी पुसलं गेलय याच भान आपण ठेवलं पाहिजेल. इतिहास होऊन गेला मग आता आम्ही कशाला त्याला डोक्यावर घेतले पाहिजेल अशी भूमिका असणाऱ्या ही लोकांना सांगू इच्छितो इतिहासाच जतन करणे हेही तेवढच आपलं कर्तव्य आहे.

गडकोट म्हणजे शौर्य
गडकोट म्हणजे मराठ्यांची अस्मिता
गडकोट म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान
गडकोट म्हणजे मराठ्यांचा अभिमान

#मराठ्यांची___धारातीर्थे
#गडकोट

🖋 मनोज शिवाजीराव महाडीक
      सांगली.
      ९८९०३५४३५३

सोमवार, १९ मार्च, २०१८

हरजीराजे महाडीक एक पराक्रमी योद्धा

हरजी राजेमहाडीक व कर्नाटकातील हालचाली (१६८८)
राजेमहाडीक या घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे.महाराष्ट्र मधील सुर्यवंशीय घराणे आहे.हरजी राजेमहाडीक हे पराक्रमी होते.शहाजीराजांची त्यानी मर्जी संपादन केली होती विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दील्या होत्या . . इ.स. १६६२ साली त्यांना महाराष्ट्रात आणले गेले.शिवाजीराजांशी त्यांचे प्रेम जडले आणि महाराजांनी आपली कन्या अंबिकाराणी हीच्या सोबत इ.स.१६६८ मध्ये विवाह करुन दिला .नंतर हरजी राजे हे कर्नातकात गेले आपल्या पराक्रमाने मराठ्यांचा रुबाब दरारा त्यांनी निर्मान केला .शिवाजी राजांच्या महानिर्वाणानंतर संभाजीराजांचे राज्यप्राप्तीच्या व राज्यारोहणाच्या वेळी ते हरज होते. इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्कातपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला .
संभाजीराजांची कन्या भवानीबाई हिचे हरजीराजांचा मुलगा शंकराजी याच्याशी लग्न झाले.त्यानी शाहू महाराजांच्या सुटकेस मदत केली.नंतर शाहूराजांकडुन
कर्नाटकात त्याना कारभार मिळाला व इ.स.१७०९ ला भवानीबाईंना तारळे महालाची सनद देण्यात आली हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले
प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग.........
_श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खुप प्रसिद्ध होते सोळाव्या शतकात हे महाडला आले महाडवरून त्यांना राजेमहाडीक असे आडनाव पडले त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे 1614 ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीस मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मोकदमी होती.
नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही 1650 ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत असताना मरण पावले शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .
___ मुलगा हरजीराजे राजेमहाडीक हे शिवरायांचे विश्वासू व सरदार होते जी मोहीम द्यावी ती यशस्वी करून येयचे छञपती शिवाजी महाराज यांनी हरजी राजेमहाडीक यांच्या कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला .
त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने 1668 ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला पुढे शिवरायांचा मृत्यू 1680 ला झाला या नंतरही ते छञपती संभाजी महाराज यांच्याबरोबर इमानाने वागले दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी यांच्याकडे ठेवली होती ती संभाजीराजेंनी यांच्याकडेच ठेवली ___.
पुढे हरजीराजे कांचीवर चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली कांची जिंकून घेतली संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.
नंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फीफिरखान जिंजीत चालून आल्यावर घमासान सुरू असलेल्या युध्दात 29 सप्टेंबर 1689 ला तोफेचा गोळा लागून जिंजी कर्नाटक येथे वीर मरण आले. _____पुढे सातारहून 20 मैलावर महाडीक इनाम असलेले वतन महाडकांचे असलेले तारळे गावी 1708 ला भेटले व वसवले अंबिकाबाईंचे पुञ शंकरजी राजेमहाडीक यांना छञपती संभाजी महाराज यांची मुलगी भवानीबाई दिल्या होत्या . शंकरजी राजेमहाडीक यांचा युध्दात मृत्यू झाल्या नंतर भवानीबाई तारळे नदीकाठी सती गेल्या..
त्याचे राजेमहाडीक वंशज भानजी हरजी राजेमहाडीक आणि मी ,तारळे.येथे याच्याशी भेट होऊन चर्चा झाली.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

महादजी शिंदयांचे छत्रपतीविरुद्ध आक्रमण

महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण

कर्नाटक प्रांतात कोल्हापूरच्या छत्रपतींचा वाढता दबदबा पेशव्यांच्या राजकारणास धोका निर्माण करत होता. मात्र सातारचे छत्रपती रामराजे हयात असेपर्यंत पेशव्यांना कोल्हापूर राज्याविरुद्ध थेट लढाई करणे शक्य नव्हते. डिसेंबर १७७७ साली छत्रपती रामराजे निधन पावले आणि यानंतर एक महिना उलटण्याच्या आधीच पेशव्यांनी कोल्हापूर राज्यावर फौज घातली.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. जानेवारी १७७८ साली केवळ कोल्हापूर शहरच नव्हे तर संपूर्ण करवीर राज्यच ताब्यात घेण्याच्या उद्देशाने तीस हजारांची प्रचंड फौज घेऊन पेशव्यांचा सरदार महादजी छत्रपतींच्या राजधानीवर चालून आला. यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ वीस वर्षांचे होते. त्यामुळे राज्याची संपूर्ण लष्करी जबाबदारी येसाजी शिंदे यांच्यावर होती. महादजीच्या तीस हजार फौजेशी युद्ध करणे प्रचंड नुकसानकारक ठरणार होते. त्यामुळे छत्रपतींचे सेनापती येसाजी शिंदे यांनी महादजींकडे बोलणी लावली. दोन लाख रुपये देऊन महादजीला वाटेतूनच पुण्याला परत पाठवून द्यावे असा येसाजींचा बेत होता. मात्र महादजीने हि बोलणी धुडकावून लावत तब्बल तीस लाख रुपयांची मागणी केली. हि मागणी पाहून जास्त काही न बोलता सेनापती येसाजींनी कोल्हापूर राज्याची फौजच तयार ठेवली. दि. १३ जानेवारी १७७८ रोजी महादजीची फौज कोल्हापूरच्या वेशीवर पोहोचली. मात्र कोल्हापूरची बुरुजबंद तटबंदी भेदून शहरात घुसणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे महादजीने कोल्हापूरास वेढा घातला. राजमाता, छत्रपती महाराज व संपूर्ण राजकुटूंब शहरातच होते. त्याचदिवशी छत्रपतींचे सरदार सटवाजी भोसले तीन हजार फौजेसह गनिमी काव्याने वेढ्यावर हल्ला करुन शहरात परतले. महादजीने कोल्हापूरच्या चारी बाजूंस तोफा व मोर्चे लावले, शहराची नाकेबंदी करुन शहरात जाणाऱ्या निरपराध लोकांना ठार मारले. तोफांचा मारा करुन तटबंदी भेदण्याचा प्रयत्न करु लागले. पण कोल्हापूरच्या अभेद्य तटबंदीपुढे महादजीच्या तोफा कुचकामी ठरत होत्या. सेनापती येसाजी शिंद्यांनी म्हैसूरच्या हैदर अलीकडे पत्र पाठवून रसद मागितली. हैदरनेही "घाबरे न होणे. आम्ही फौज पाठवतो. हिंमत न सोडावी." म्हणून पत्र पाठवले. महादजीलाही कोल्हापूर लढून घेणे शक्य नव्हते. शिवाय बाहेरुन म्हैसूरची फौज आल्यास महादजीची कोंडी होणार होती. त्यामुळे फितुरीने काही साध्य करता येते का याची चाचपणी करु लागले. पण तेदेखील साध्य झाले नाही. महादजीने शहराबाहेरील व्यापारीपेठा जाळून टाकल्या. छत्रपतींच्या रयतेस होईल तेवढी तोशिस देऊ लागले. रोज तोफांचा मारा तटबंदीवर होत होता. आता थेट शहरातच तोफा डागल्या जाऊ लागल्या. निरपराध लोक मरत होते पण महादजी शिंदे तीस लाख रुपये द्या म्हणून अडून बसले होते. वर "कोल्हापूर तर घेतोच आणि पन्हाळगड पण घेतो" अशा छत्रपतींना धमक्या देत होते. तटबंदी भेदण्यासाठी महादजीने पुण्याहून "महांकाळी" तोफ मागवली. पत्रांवर पत्रे पाठवूनही तोफ काही येईना. तेवढ्यात हैदरअलीने छत्रपतींना पाच लाख रुपये पाठवून दिल्याची बातमी महादजीला समजली. हि बातमी कितपत खरी हे समजावयास मार्ग नाही. महादजीची सारी भिस्त आता महांकाळी तोफेवर असल्याने ती येईपर्यंत त्यांनी लढाईची तीव्रता कमी केली. मात्र निरनिराळ्या मार्गांनी येसाजी शिंदेंना उपद्रव देण्याचे सुरुच ठेवले.

यादरम्यान महादजीने एक अघोरी मार्ग अवलंबला. राजधानी कोल्हापूरात छत्रपतींची जी फौज होती त्यांची घरेदारे आसपासच्या खेड्यांत विखुरलेली होती. त्यांचा शोध घेऊन त्यांच्या बायकापोरांना त्रास देण्याचे, त्यांची घरे जप्त करुन उध्वस्त करण्याचे सत्र महादजीने सुरु केले. या प्रकारामुळे सटवाजी भोसल्यांनी पुन्हा एकदा फौज घेऊन शहराच्या बाहेर येऊन महादजीवर हल्ला चढवला. शहरातून महादजीच्या फौजेवर तोफांचा मारा होऊ लागला. छत्रपतींच्या फौजेची घरेदारे जप्त करुन त्यांच्या पोराबाळांना, म्हाताऱ्या आईबापाला उघड्यावर आणण्याच्या महादजीच्या निंदनीय कृत्यामुळे छत्रपतींची फौज अधिकच त्वेषाने पेटून उठली. २८ फेब्रुवारी १७७८ रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.

परकीयांची चाकरी करणाऱ्या समस्त मराठ्यांना स्वातंत्र्याचा सूर्य दाखविणाऱ्या श्री शिवप्रभूंनी स्थापन केलेली हि छत्रपतींची गादी. या गादीवर बसणारे 'महाराज छत्रपती' म्हणजे सर्व क्षत्रियांचे प्रमुख, हिंदूंचे एकमेव 'हिंदूपदपातशहा'. या छत्रपतींच्या गादीविरोधात जाऊन, खुद्द छत्रपतींच्या राजधानीवर आक्रमण करुन महादजी शिंद्याने छत्रपतींकडून खंडणी उकळली. निष्पाप प्रजेची कत्तल केली. पूर्वी आदिलशहा, मुघल याहून वेगळे काय करायचे ? पण अशाही बिकट परिस्थितीत ज्यांनी हे प्रकरण अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळले, ज्यांच्यावर करवीर राज्याची संपूर्ण भीस्त होती ते सेनाखासखेल श्रीमंत येसाजी शिंदे यांच्या स्वामीनिष्ठेचे व श्रीमंत सटवाजी भोसले व त्यांच्या अज्ञात मावळ्यांच्या असिम शौर्याचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.

शत्रूने जरी आपली मर्यादा सोडून आपल्या घरादाराला त्रास दिला तरीदेखील छत्रपतींवरील आपली निष्ठा ढळू न देणाऱ्या शूर मावळ्यांना मुजरा...
छत्रपतींवर चालून आलेल्या महादजी #शिंदे यांना रोखणाऱ्या #छत्रपतीनिष्ठ येसाजी #शिंदे यांना मुजरा...

#KarvirRiyasatFB #करवीर_राज्य

संदर्भ -
मराठी रियासत उत्तर विभाग भाग १
करवीर रियासत चौथी आवृत्ती
करवीर रियासतीची कागदपत्रे खंड १, ले. २५
Satara Historical Research Society : Book ll
कोल्हापूर प्रांताचा अर्वाचीन इतिहास (मोडक)

शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

जिजाऊ जन्मस्थळ : सिंदखेडराजा

जिजाऊ जन्मस्थळ-सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा):

  १५७६ च्या सुमारास निजामशाहीच्या काळात भरभराटीला आलेले शहर म्हणजे सिंदखेड.या गावची देशमुखी विठोजी पुत्र लखुजीराजे जाधवराव यांना मिळाली.आणि याच काळात सिंदखेडमधे जाधवरावांनी एक भुईकोटवजा वाडा बांधून घेतला.

   सिंदखेड नगरात अनेक वाडे-महाल उभे राहिले,तलाव खोदले, पाण्याच्या बारावा कोरल्या,पडक्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला,मंदिरांना पुजारी आले पूजा-अभिषेक सुरु झाले.सिंदखेड परगण्याचा कारभार जाधवराव मंडळी नेटाने चालवू लागली,लखुजीराजांचा धाकटा भाऊ जगदेवराव खांद्याला खांदा लावून कारभारात लक्ष देत असे.राजे लखुजीना म्हाळसा उर्फ गिरिजाबाई यांचेकडून चार पुत्र होते,दत्ताजी,राघोजी,अचलोजी आणि बहादुरजी परंतु कन्यारत्न नव्हते. राणी म्हाळसाबाई  रेणुकादेवीच्या निस्सीम भक्त होत्या, त्यांनी देवीला नवस केले,आणि देवी नवसाला पावली.

    जिजाऊ जन्म :

हेमलंबी नाम संवत्सर शके १५१९ पौष शुद्ध पौर्णिमा गुरुवार या दिवशी पुष्य नक्षत्रावर सूर्योदय समयी म्हणजेच इंग्रजी कालगणनेनुसार १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास म्हाळसाबाईंनी कन्यारत्न जन्मास घातले.अवघ्या हिंदुस्थानाचा इतिहास बदलायला याच दिवशी सुरुवात झाली असे म्हणता येईल.

     राजे लखुजी बहुत खुश झाले,नगारे वाजू लागले,हत्तीवरून साखर वाटली गेली.मोठे नगरभोजन झाले.लखुजींचे धाकले बंधू जगदेवराव सोबत शंभर स्वार घेऊन सपत्नीक तुळजापूरला जाऊन देवीची ओटी भरून आले.        

    जिजाऊ जन्मस्थळ:

   जाधवराव बखरीच्या उल्लेखानुसार राजवाड्याच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हाळसा महाल होता.याच ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला. राजवाड्याला १२ दालने असलेले तळघर आहे. त्याच्या वरच्या बाजूस महालाची जोती आणि एक खोली शिल्लक आहे. हेच जिजाऊ जन्मठिकाण मानले जाते.

सिंदखेड इतर वास्तू,अवशेष यादी:

   सध्या वाड्यात मुख्य प्रवेशद्वार,तटबंदी,अनेक कोरीव मूर्ती-दगड,काही तोफा,तसेच१२ दालने असणारे तळघर,राजवाड्याची जोती,चौक,रंगमहाल,जिजाऊ जन्मस्थळ इत्यादी अवशेष आहेत.

   काळा कोट हा खणखणीत तटबंदीचा भुईकोट बाजारपेठेच्या बाजूस आहे (दुर्दैवाने याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नाही) याच कोटात हत्याराना धार लावायचे विशिष्ट गुणधर्म असलेल्या पाण्याची एक विहिर आहे.

  याशिवाय सिंदखेड मधे राजे लखुजी, दत्ताजी,अचलोजी,राघोजी,आणि यशवंत यांच्या समाध्या, निळकंठेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर,रेणुका मंदिर, मोती-तलाव ,चांदणी-तलाव,सजना-बारव,पुतळा-बारव,गंगासागर,बाळसमुद्र असे अनेक इतिहासाचे साक्षीदार आजही उभे आहेत.

सिंदखेड मधील काही शिलालेख :

१) लखुजीराजे समाधी बाहेरील बाजू डावी :

ओळ १- सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी सौ

ओळ २- अरधांगी ठाकराईराणी त्यांचे पोटी जाधवराव लुकजी म

ओळ ३- हाराज अरधांगी गिरिजाईराणी त्यांचे पोटी पुत्र दत्ताजी व

ओळ ४- अचलाजी व राघोजीराजे व जाधवराव लखुजी व पु

ओळ ५- त्र दत्ताजी त्यांचे पोटी येसवंतराजे व लिंबाजी   

              

२) लखुजीराजे समाधी बाहेरील बाजू उजवी :

ओळ १- सींदखेडचे देशमुख भानवसे वीटोजी त्यांचे अरधांगी

ओळ २- ठाकराईरानी त्यांचे सुपुत्र लखुजी महा-(राज)

३) निळकंठेश्वर मंदिर नंदीमागे खांबावर:

ओळ १- नीळ

ओळ २- कंट

ओळ ३- श्रीगणेशाय न

ओळ ४- मः साके १५०९

ओळ ५- सार्वजीत सवत्स    

ओळ ६- रे श्रावण सुदि पा

ओळ ७- डवा जीर्णोद्धार हे

ओळ ८- देऊळ धबाळे रा

ओळ ९- घोजी लकुजी जाधव

ओळ १०- श्री देक्षमूष परग     

ओळ ११- णे सीधपूर

४) सती समाधी लखुजी समाधीच्या समोर :

ओळ १- ll सके १६३७ मनमथ नाम संवत्सरे आ

ओळ २- ll श्वि (न) सुधि दशमी ते दिवशी मोरतब ll

ओळ ३- षडोजी याधव अरधंगी सोरबाबाई 

ओळ ४- सती ll सेवक तेजजी नारायणजी जाधो

  सिंदखेड च्या भेटीत जिजाऊ जन्मस्थानी नतमस्तक तर व्हावेच पण संपूर्ण गावात अभ्यासू नजरेने फेरफटका नक्की मारावा, पूर्वेतिहासाची साक्ष देणारे कोरीव दगड मूर्ती सर्वत्र पसरलेल्या आहेत.

-अजय काकडे

संदर्भ :

जाधवराव बखर

पुरातत्व खाते पुस्तिका

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

बुऱ्हाणपुरची लूट (बुऱ्हाणपूरची लढाई)

.               *बऱ्हाणपूरची लढाई*
________________________________

इतिहास लेखन : मनोज शिवाजीराव महाडिक     
_________________________________

  (30 जानेवारी 1681)

मराठ्यांनी शंभू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सुरत लुटायचा बहाणा शत्रूगोटात केला, मात्र मराठ्यांचा इरादा वेगळाच होता सुरत ऐवजी बुऱ्हाणपूर लुटायचा मराठ्यांनी ठरवले. बऱ्हाणपूरचा सुभेदार औरंगजेबाचा दुधभाऊ खानजहान बहादूरखान कोकलताश आपल्या पुतन्याच्या लग्नासाठी औरंगाबाद ला 4 दिवसापुर्वी 3000सैन्य घेबून गेला होता, याच मोक्याच्या जटक्यात बुऱ्हाणपूरावर हल्ला करायचे ठरवले. आता बुऱ्हाणपूर चा नायब सुभेदार होता काकरखान.

दुपारच्या वेळेस ठाणेदार धावत धावत काकरखानजवळ येऊन सांगू राहिला की गेल्या 2 दिवसापासून सुरत जवळच्या जंगलात त्यांना मराठ्यांची घोडी व सैनिक दिसले म्हनुन, आता मात्र काकरखान चांगलाच भिला होता कारण कोकलताश ही नव्हता व तो सोबत सैन्य घेऊन गेल्यामुळे काकरखान जवळ फक्त 5000 सैन्य बुऱ्हाणपूर मध्ये होते. संभा आता सुरत लुटणार या विचाराने तेथील गावकरी, व्यापारी, परदेशी वखारवाले चांगलेच भिले होते कारण 20 वर्षांपूर्वी पहिली लूट तर परत त्याच सुरतेवर 12 वर्षांपूर्वी दुसरी लूट शिवरायांनी केली होती आता त्याच सुरतेवर परत 12 वर्षांनी शिवाचा बछडा संभा आलाय या निरोपाने सगळेच मोघल निम्मे गार झाले होते.

सुरतच्या ठाणेदाराने काकरखान ला सैन्य मराठे हल्ला करण्याअगोदर तातडीने सैन्य पाठवायला सांगितले, काकरखान ने सहकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने 4000 सैन्य व तुंबळ असा दारुगोळा सुरत च्या दिशेने पाठवला,  काकरखानचे सैन्य निम्म्यात पोचलो तोवरच सायंकाळी त्याचे 4-5 जासूद धावत आले व म्हणाले " हुजूर घात झाला मरहट्टे सुरत ऐवजी बुऱ्हाणपुरावर चाल करून आलेत" आता मात्र काकरखान कळायचे बंद झाले, त्याला समजतच नव्हते की आताच शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक 15 दिवसारपूर्वीच झाला होता आणि त्यात ही रायगडावरून बुऱ्हाणपूर ला यायला कमीत कमी 6 दिवस लागतात दिवस रात्र घोडी दौडली तर, तो विचारच करत होता, त्याला भीती वाटायला लागली तो मनोमनी कोकलताश ला शिव्या देऊ राहिला.
सायंकाळी परत 2 जासुस आले आणि काकरखान ला माहिती दिली की इथून 3 कोसावरील जंगलात मराठ्यांनी तळ ठोकला आहे व ते उद्या सुर्योदय होण्याच्या अगोदर बऱ्हाणपूर लुटून नेणार होते, आता मात्र काकरखान गारठला पण जबाबदारी या नात्याने तो थोडासा सावरलाही, बऱ्हाणपूरातील व्यापारी, गर्भ श्रीमंत लोक सोन्याच्या मोहरा, दागिने घेऊन काकरखान जवळ येऊन वाचवण्यासाठी विनवण्या करू लागली.
काकरखानानाने बुऱ्हाणपूरतील सर्व व्यापाऱ्यांजवळचे लोक एकत्र केले व एकूण 2000 ची फौज तयार केली व मराठे सकाळी हल्ला करायच्या अगोदर आपण रात्रीच मराठयांनवर हल्ला करून त्यांना संपवायचं असा डाव त्याने केला व ठरल्या प्रमाणे मध्यरात्री 1000 घोडदळ व 1500 भूदळ सैन्य बाहेर पडले.

बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी मधरस्त्यात एक खंदक खोदला होता, काकरखान ची 500-600 ची पहिली तुकडी पुढे होती, या खंदका मध्ये पूर्वी संकट आले की लाकडे टाकून वेटवून देऊन सरंक्षण केलं जायचे, आता मोघलांच्या कापाळावरून ऐन गारठ्यात घाम फुटला होता, तुकडीच नेतृत्व स्वतः काकरखान करतं होता. खंदकाच्या पलीकडे जंगल होते जिथे मराठ्यांनी तळ ठोकला होता.

काकरखान जरा भीतभितच पण त्याला फौज असल्यामुळे बळ आले होते आशा अवस्थेत तो खंदका जवळ पोचला, त्याला मात्र तिथे कसलीशी कुजबुज जाणवली, तो सैनिकाना सावध होण्याच्या इशारा देणार याच्या अगोदर लपून बसलेले मराठ्यांची घोडी बाहेर पडली व एकच हल्ला कल्लोळ माजला, हर हर महादेव चा नारा गाजला, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय म्हणत मराठे मोगलांवर तुटून पडले. हाना sss मारा sssss म्हणत सपासप वार होऊन धरतीला रक्ताभिषेक होऊ लागला, काकरखानाचे 500-600 सैन्य पुरतेच गारद झाले तसा काकरखानाने पळून जाऊ लागला.

याचवेळी शेजारच्या जंगलात दुसऱ्या मोहिमेसाठी आलेल्या सरसेनापती हंबीर मामांना बऱ्हाणपूरच्या दिशेने हर हर महादेव चा नारा ऐकू आला तसा त्या तुकडीतले सगळे सैन्य हंबीर मामांनी एकत्र केले पण पाहिले त्यांना वाटलं हा शत्रूचा डाव असेल ते आपली दिशाभूल करत असतील पण जंगलातून 10-12 घोडेस्वार हंबीर मामांच्या दिशेने आले व त्यांनी हंबीर मामांना जेंव्हा सांगितले की या मोहिमेवरती स्वतः युवराज छत्रपती आहेत हे कळल्यावर हंबीर मामासंह सगळ्या सैन्याची छाती फुलली , लागलीच सैन्य बुऱ्हाणपूर च्या दिशेने धावत सुटले व आपल्या सैन्याला मिळाले मग मात्र मराठ्यांनी संपूर्ण बऱ्हाणपूर ला वेढा घालून नाकाबंदी केली, व व्यापाऱ्यांनि घरात लपवून ठेवलेले सोने नाणे कुदळी खोऱ्याने व पारेने काढून लुटले. संबंध 3 दिवस लूट चालू होती, याच मोहिमेत शंभूराजांनी जवळच्या बाजारातून सौदागर उस्मान कढुन 2000 अफगाणिस्तान मधले घोडे विकत घेऊन घोडदळ अजून भक्कम केले.
छत्रपती संभाजी महाराजांची राज्याभिषेकानंतरची ही पहिलीच मोहीम होती ती अपेक्षेपेक्षा त्यांना जास्तच यशस्वी वाटली !

एक कोटभर रकमेची दौलत घेऊन सैन्य 4 तुकड्या कडून 4 दिशेने किल्ले साल्हेर च्या दिशेने रवाना झाले, तिकडे मात्र कोकलताश ला निम्म्या रस्त्यात ही बातमी समजली तो मध्यातूनच आपल्या पुतण्याच्या लग्नाला न जाता बुऱ्हाणकडे अंतर काटू राहिला तोपर्यंत मराठे बऱ्हाणपूरातून निसटले होते !

________________________________

🖋 इतिहास वर्णन व शब्दांकन :
      मनोज शिवाजीराव महाडिक
      स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
      संपर्क : ०९८९०३५४३५३
      मेल: manoj.swarajya96@gmail.com
__________________________________