जावळिचा वाघ - किल्ले ढवळ्यागड.....
(सह्याद्रितिल एक ट्रेकिंग थरार)
परवा इतिहासाची पुस्तके चाळत बसलो होतो त्यात जावळिचा इतिहास हाती लागला. इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जावळिच्या चंद्रराव मोरेने छत्रपती शिवरायांना धमकी वजा पत्र लिहिले होते व त्यात त्याने शिवरायांना सरळ सरळ धमकावले होते की , तुम्ही जावळि खोर्यात येवून तर बघा तुमची काय हालत करतो ते??? शेवटी छ. शिवरायांनी चंद्रगड किल्ला जिंकला हा भाग वेगळा पण मनात एक उत्कंठा , अनेक प्रश्न निर्माण झाले की, राव या मोरेने एवढे धाडस त्यावेळी कसे काय केले?? किंवा कोणाच्या जिवावर केले?? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी आम्ही किल्ले चंद्रगड (उर्फ़ ढवळ्यागड) दुर्ग भ्रमंती करायचे ठरवले...... आणी भ्रमंती करून आल्यावर आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
काल रविवार.... ऑफिस ला सुट्टी होती मग आमचा दुर्ग भ्रमंतिचा प्लान सुरु झाला. तसे पाहता जावळिच्या खोर्यातिल हा माझा पहिलाच ट्रेक होता त्यामुळे उत्कंठा पण शिगेला पोहोचलेली...
आमचे मित्र सदाशिवगड संवर्धन समितीचे अध्यक्ष शिवश्री. रोहित माने, आमचे हितचिंतक शिवश्री. नितिन लोखंडे व आमचे तासगाव चे नविन दुर्गप्रेमी मित्र शिवश्री. सागर पाटिल यांना फोनवरून कल्पना देवून आम्ही रविवारी सकाळी लवकर जायच ठरवल...
रविवार उजाडला पाहटेपासुन आमची जायची तयारी सुरु झाली. 5 वाजता बैग भरुन आम्ही प्रस्थान केले. कराड मधे सगळे एकत्र जमलो व निघालो... पहाटेची थंडी अनुभवत आम्ही महाबळेश्वर मधे पोचलो. इथे मात्र थंडी मुळे खुप हाल झाले परंतु जसे पोलादपुर मार्गे जायला आम्ही घाट उतरायला लागलो तस तसे थंडी कमी जाणवायला लागली. चोहोबाजुनी सह्याद्रिचे कातळ कड़े, हिरवागार निसर्ग , व त्या डोंगराआडून दिसणारी किल्ले प्रतापगड ची माची बघून मन भरुन आले.....
अखेर आम्ही घाट उतारून कापडे फ़ाट्यावर पोहोचलो. तेथे पाण्याच्या बोटल्स घेवुन आम्ही उमरठ गावचा रस्ता विचारत निघालो. उमरठ गाव म्हणजे स्वराज्याचे सेनापती नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थान आहे. ज्या आपल्या बापजादयानि गडातटावरुन इतिहास घडवला , "आदि लगिन कोंढान्याच मग माज्या रायबाच" म्हणत ज्यांनी स्वराज्य निष्ठा दाखवली त्या नरविराच हे गाव. गावात आल्यावर प्रथम समाधी पशी गेलो . येथे तानाजी मालुसरे व शेलार मामा या दोन विरांच्या समाधी आहेत. समाधिपशी नतमस्तक झालो व वीर मशालीच दीप प्रजलन करून पुढे ढवळे गावचा रस्ता विचारत निघालो. जाताना मालुसरेंच्या स्मारकाबाहेर किराना दुकानामधे श्री. पोकळे नावाच्या सद्ग्रहस्थाकडे 1965 साली आम्ब्याच्या झाडाच्या ढोली मधे त्याना 2 तलवारी सापडल्या आहेत त्या आवर्जुन पहाव्यात. त्यापैकी एक मराठा तलवार तर एक दांडपट्टा आहे. तलवारी हातात घेतल्यावर एक वेगलाच अनुभव आला. याच शस्त्राने मावळ्यानि शत्रुचा बीमोड केला होता.
येथून पुढे 5KM वर ढ्वळे गाव आहे. गावातील शाळेत गाड्या लावून आम्ही मंदिराच्या पाठीमागून किल्ल्याला जायला वाट आहे त्यामार्गे निघालो. वाटाड्या घ्यायचाच नाही अशी सगळ्यांचा ठराव झाल्यावर आम्ही गावातील गावकर्यांना माहिती विचारून पायी प्रवास चालु केला. येथून एका डोंगराच्या आडोशाला किल्ले ढवल्यागड असल्यामुळे प्रथम कोळिवस्ती विचारत तेथेपर्यन्त पोहोचलो. कोळी वस्तिपासुन किल्ला दिसायला लागला. किल्ल्याकडे तोंड करून चालायला लागलो, जाताना ओढा लागेल त्या ओढ्यातुन अर्धा तासाची चढ़ाई केल्यावर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इथेपर्यन्त येइपर्यन्त अंगातला सगळा त्राण गेला होता. याऊलट खरी चढ़ाई आता सुरु झाली होती. कारण एकतर आम्ही रस्ता चुकलो होतो आणि आमच्या समोर आता फकत काळा कातळ कडा होता. रॉक क्लाइम्बिंग करायच होत पण आमच्याकडे वायर रोप नव्हता. शेवटी रिस्क घेवुन आम्ही वर जायचच ठरवल. खरपाहता हा आमचा निर्णय चुकीचा होता कारण सेफ्टी सामानाशिवाय ट्रेक करणे हे कधीही धोक्याच. थोडा जरी पाय टाकायला चुकला तर मरनार हे निश्चित होत पण दुर्ग प्रेमाने आम्हाला एवढ वेड लावलय की त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार झालो असतो. शेवटी निर्णय झाला व आम्ही ट्रैकिंग ला सुरवात केलि. "सह्याद्री" ही 3 अक्षरे नुसती वाचायला बरी वाटतात पण ते अनुभवल्यावर त्याच खर अक्राळ विक्राळ रूप समजते. काळ्या कातळातले तासिव कड़े , भेभान वारा, व आपल्यासमोर एकच उद्धिस्ट ते म्हणजे कहिहि करून गडावर जायचेच. पुस्तकातल्या निम्म्या प्रश्नांच उत्तर मला मिळाल होत, ते म्हणजे या गडावर सैन्य जरी कमी असल तरीही गडाच्या नैर्सगिक भिषण रुपामुळे गडावर आक्रमण करायलाच कोण धजावनार नाही. निम्म्यात गेल्यावर पाय थरथर कापायला लागले, खाली पाहिले की डोळे फिरायचे 700-800 मीटर खोली, पकडायला जागा कमी, पाय रोवायला खाची पण कमी एवढा तासिव कडा, मध्यात गेल्यामुळे धड उतरुही शकत नव्हतो, पुन्ग्या टाइट झाल्या पण पुन्हा दगडाला ठेपा देत व गवताला पकडून अखेर वर पोहोचलोच. गडावर पोहोचताच मनाची मरगळ आसपासच दृश्य बगुण गायबच झाली एवढ तूफान सह्याद्रीच सौन्दर्य किल्ले ढवळ्यागडावर आपल्याला पहायला मिळते.
ज्या सौंन्दर्या च वर्णन शब्दात कमी पडेल असा निसर्ग खजाना आपल्याला डोळे फाडून बगितल्याशिवाय कोणीही राहणार नाही. येथून गडाच्या उत्तरेकडे चालत जाताना सुरवातीला ढवळ्या महादेवाच शिवलिंग व नंदी दगडात कोरलेला दिसतो. येथे मंदिर कुठेही नाही कारण गडावर वार्याचा वेग असल्यामुळे येथे काहीही टिकू शकत नाही. शिवलिंगापासून पुढे गेल्यावर तटबंदिच्या खाली 5 पाण्याची टाके आहेत, पण येथे पोहोचता येत नाही. येथून पुढे सरळ गेल्यावर आम्ही बालेकिल्ल्यावर गेलो. जाताना रस्त्यामधे एक पाण्याचे टाके लागले पण यामधल पानी पिन्यायोग्य नाही. त्याच्या थोडच पुढे राजवाड्याचे पडलेले अवशेष होते त्याच्या बाजुलाच देवी जननी कमळजा चा चौथरा आहे व दुसरे एक शिवलिंग आहे. शिवलींगासमोर एक दगडी गोळा पडलेला होता.
आणखी उत्तरेकडे चालत गेल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी व ख़ाली उतरायला पायर्या दिसल्या. तेथून खाली गेल्यावर एक अप्रतिम अस पाण्याच टाक गडाच्या एकदम काठावर कोरलेल आहे ते पाहून त्यामधिल पानी पिलो. पाणी थंड व चवदार होते, तहानच भागली पाण्याने. या टाक्याच समोरच कातळामधे पहरेकर्यानसाठी कोरलेली गुहाही आजही चांगल्या अवस्थेत आहे. हा शेवटचा टप्पा आहे. येथून पायर्यापर्यंत गेल्यावर त्याच्या डाव्या बाजूला 3 टाके आहेत तेही जरुर पहावे......
इतिहास -
कांगोरी गड चंद्रराव मोर्यांनी जावळीच्या खोर्यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. चंद्रगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘गहनगड’’ ठेवले. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर वमॉरीसन या इंग्रज अधिकार्यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.
कसे जाल-
महाबलेश्वर मधून पोलादपुर रोडला 43 km वर कापड़े फाटा लागतो तेथून उजव्या बाजूने आत वळुन उमरठ गावचा रोड विचारावा. उमरठ पासून 7 km वर ढवळे हे गडाच्या पायथ्याच गाव आहे.
जय जीजाऊ
जय शिवराय
जय रौद्र शंभो
माहिती संकलन आणि लेखन-
स्वराज्य योद्धा ट्रेकर्स
शिवछावा- मनोज शिवाजी महाडिक
"स्वराज्य" शिवशक्ति चौक , नेवरी.
ता. कडेगाव जि. सांगली 415311
मो. 9156571313 / 9890354353
मेल- manoj.swarajya96@gmail.com
©सर्व माहिती व फोटो संरक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा